दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देणाऱ्यांना मतदानाचा अधिकार नसावा - बाबा रामदेव
बाबा रामदेव पुन्हा एका चर्चेत आले आहेत. यावेळेस त्यांनी देशाच्या वाढणाऱ्या लोकसंख्येवर भाष्य केले आहे.
हरिद्वार
- योग गुरू बाबा रामदेव आपल्या खास शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. आजही एका विधानामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. यावेळेस त्यांनी देशाच्या वाढणाऱ्या लोकसंख्येवर भाष्य केले आहे. 'जी लोक दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देतील, त्यांना मतदानाचा अधिकार नसावा', असे परखड मत बाबा रामदेव यांनी मांडले आहे. शिवाय, माझ्याप्रमाणे जी लोक लग्न करणार नाहीत, त्यांना समाजात विशेष सन्मान मिळाला पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं आहे. हरिद्वारमध्ये एका कार्यक्रमाला बाबा रामदेव संबोधित करत होते.
या देशामध्ये जे माझ्याप्रमाणे विवाह करणार नाही, त्यांचा विशेष सन्मान करायला हवा. पण लग्न केल्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्य जन्म देणाऱ्यांना मतदानाचा अधिकार नसावा.
पुढे ते मिश्किलपणे असंही म्हणाले की, पुरातन काळात लोकसंख्या कमी होती, या पार्श्वभूमीवर वेदांमध्ये 10-10 अपत्यांना जन्म देण्यास सांगितले गेले आहे. आता ज्यांचं सामर्थ्य आहे, त्यांनी करावं. पण आता तशीही देशाची लोकसंख्या 125 कोटी एवढी आहे. मात्र जर कोणी बुद्धिमान पुरुष किंवा स्त्री आहे आणि जर ते पूर्णतः जागृत आत्मा असतील तर ते एकटेच हजारो, लाखो, कोट्यवधींवर भारी पडतात, ही भारतीय ज्ञानाची परंपरा आहे.

No comments:
Post a Comment