तुम्हांला खरंच देशाची सुरक्षा करायची आहे की फक्त मुस्लिम महिलांना दहशतवादी म्हणून संशयाची राळ उठवायची आहे?
बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पहिली गोष्ट म्हणजे श्रीलंकेने आतापर्यंत तरी बुरख्यावर कोणतीही बंदी लागू केलेली नाहिये. तर "फेस कव्हरींग आॅब्जेक्ट्स" वर बंदी आणण्याचे वैयक्तिक विधेयक एका खासदाराने तेथील संसदेत मांडले आहे, ज्यावर अजुनही राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेली नाहिये. त्या विवेयकात बुरख्याचा कुठेही उल्लेख नाहिये.
फक्त चेहरा झाकणे, एवढंच म्हणजे बुरखा नसतो. पण प्रकरणाची सखोल माहिती न घेता आपल्या महाराष्ट्रातले काही नेते अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन भारतातही तशी बंदी लावण्याची मागणी करत आहेत, जे संवैधानिकदृष्ट्या कधीही शक्य होऊच शकत नाही.
कारण फक्त मुस्लिम महिलाच नव्हे तर मारवाडी, राजपूत, राजस्थानी, वाल्मिकी व मराठा देशमुख महिलाही घुंघट घेत असतात, जैन साधु व साध्वीही अर्धा चेहरा झाकत असतात. मग त्यावरही बंदी आणणार का?
गुन्हा करण्यासाठी वापरले जाणार्या साधनांवर बंदी आणणे जर खरंच आवश्यक असेल तर मग हेल्मेटवरही बंदी आणणार का? कारण काही वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या एका फायरींगच्या घटनेत दहशतवाद्यांनी हेल्मेट घातलेले होते. मागे सारस्वत बँकेवर छत्रीचा वापर करून चेहरा झाकून चोरी झाली होती, मग छत्रीवर बंदी आणणार का?
हवेतील जंतुपासून वाचण्यासाठी तोंडावर हिरव्या रंगाचा मेडिकल मास्क चढवला जातो आणि तो वापरण्यास कुणीही बंदी आणू शकत नाही. मग उद्या बुरख्याने चेहरा झाकण्यास बंदी आल्यावर मुस्लिम महिला या मेडिकल मास्कचा वापर करू लागली तर तुम्ही त्यांना कसं काय रोखणार आहात?
हा सगळा प्रकार करणार्यांना एक प्रश्न असा की, तुम्हाला खरंच देशाची सुरक्षा करायची आहे की फक्त मुस्लिम महिलांना दहशतवादी म्हणून संशयाची राळ उठवायची आहे? खरंच सुरक्षेचा प्रश्न असेल तर मग याच मुद्यावर श्रीलंकेतील "जमियत उलेमा एक सिलोन"ने मध्यम मार्ग स्वीकारत तेथील सर्व मुस्लिम महिलांना सुरक्षा रक्षकांशी सहकार्य करण्याचं आवाहन केले आहे आणि कुणावर संशय आल्यास आणि महिला सुरक्षाकर्मींनी मागणी केल्यास आपला चेहरा महिलांनी त्यांच्यासमोर उघड करणायाचे आवाहन केले आहे. त्यासाठी पूर्ण बुरखा काढायची गरज नाही. हा आहे मध्यम मार्ग ज्याद्वारे सुरक्षाही होते आणि महिलांच्या अंगप्रत्यंगांचे प्रदर्शन थांबून बुरखाकवचाद्वारे त्यांची काही आंबट नजरांपासून संरक्षणही होते.
तथागतांचा मध्यम मार्ग अवगत असलेल्या श्रीलंकेत उलेमांनी सांगितलेला हा मध्यम मार्गच राबविण्याची शक्यता आहे. भारतात तो आधीपासूनच राबविला जातो. आजही अनेक माॅलमध्ये जातांना बुरखाकवचधारी महिलांना महिला सुरक्षाकर्मी एका रूममध्ये नेऊन त्यांचा चेहरा बघून धातूशोधक यंत्राद्वारे तपासणी केली जाते आणि मग आत सोडले जाते.
काही वर्षांपूर्वी पुसद परिसरात बंजारा समाजातील महिलांच्या पारंपरिक घागर्यावर बंदी आणण्याची मागणी होत होती. या घागर्याचा उपयोग काही महिला चोरी करणायासाठी करत असल्याचा काही जण आरोप करत होते. परंतु स्वाभिमानी बंजारा महिलांनी आंदोलन करून ती मागणी धुडकाऊन लावली.
कारण फक्त गुन्ह्यांच्या साधनांवर बंदी आणल्याने गुन्हे कमी होणार नसून आपली सुरक्षा व्यवस्था, गुप्तहेरांचं सशक्त जाळं व सुरक्षाकर्मींच्या दक्षतेत वाढ करण्याची गरज आहे.
आज देशातील अनेक संवेदनशील ठिकाणांचे कॅमेरे एकतर निकामी असतात किंवा काम करत असले तरी त्यातील विज्युअल्स धूसर असतात. अनेक अपराधी त्यामुळेच सुटतात. ही सर्विलियन्स यंत्रणा मजबूत करण्याची गरज आहे.
मुस्लिम महिलांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे हा समस्त नारी जातीचा अपमान आहे. खरं म्हणजे श्रीलंकेतील तो बुरखाधारी आत्मघाती हल्लेखोर महिला नसून पुरूष होता. त्यात भारतीय शिलवंत बुरखाकवचधारी महिलांचा काय दोष.
हादेखील खरं आहे की, बरख्याची जबरदस्ती नको, पण कुणी कोणतं वस्त्र प्रावरण नेसावं, हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. घटनेनं कलम 19 व 25 मध्ये जिथं भाषण स्वातंत्र्य दिलंय, तिथं वस्त्र स्वातंत्र्यही दिलं आहे.
मुस्लिम महिलांच्या अंगावरचे कपडे घेचण्याचा जर प्रयत्न झाला तर देशाची कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता आहे. कारण मुस्लिम महिला जीव देतील पण रस्त्यावर बुरखा काढणार नाहीत, मग देशभरातील तुरंग कोट्यवधी मुस्लिम महिलांसाठी कमी पडतील. अशी परिस्थिती उद्भवू द्यायची नसेल तर बोलघेवड्या राजकारण्यांनी आपल्या जीभेला लगाम लावला पाहिजे.
मुस्लिम महिलांवर बुरख्याची कुणीही जबरदस्ती करत नाही. त्या स्वतःहून त्या नेसतात. त्यांचं लहानपणापासून ब्रेनवाॅश करण्यात आल्यामुळे त्या तो नेसतात असा आरोप जर कुणी करत असेल तर मग अनेक ब्राह्मण मुली स्वतःहून इस्लाम कबूल करून स्वतःच्या मर्जीने आज कसा काय बुरखा नेसत आहेत, याचं उत्तरही द्यावं. ब्रेनवाॅश तर शाॅर्ट स्कर्ट नेसण्यासाठीही केला जातो. म्हणून हा आरोप बिनबुडाचा आहे.
नागपूरच्या अनेक हिंदू मुलीही पर्यावरण प्रदर्शनापासून वाचण्याकरिता जशा स्कार्फ बांधतात तसंच वासनेने वखवखलेल्या नजरांच्या सांस्कृतिक नजरांपासून वाचण्याकरिता मुस्लिम महिला स्वतःहून बुरखा नेसतात, कुणी तो नेसण्याची जबरदस्ती करत नाही. म्हणून तो उतरविण्याचीही जबरदस्ती करू नये.
कुणी रस्त्यावरून जाणार्या मुलीला जॅकेट काढण्यासाठी सांगत असेल तर कायद्याच्या भाषेत ही जशी "इव्ह टिसींग" आहे, तशीच कुणी बुरखा काढण्यासाठी म्हणत असेल तर ती देखील एकप्रकारची इव्ह टिसींगच आहे. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.
आत्मघाती हल्लेखोर तर राष्ट्रपती नेसतात तशा शेरवाणीतही बाँब लपवून आणू शकतो, मग काय शेरवाणीवरही बंदी आणणार का?
वास्तविकता ही आहे की, महिलेच्या शरीराचे उभार, अंग प्रत्यंग पाहून स्त्रीला फक्त नयनसुखाचं साधन मानणारी भांडवलदारधार्जीनी पुरूषी मानसिकता यामागे आहे. अशी मानसिकता भारतीय संस्कृतीविरूद्ध आहे, कारण बुरखा हा भारतीय संस्कृतीचाही भाग आहे. बाकी श्रीलंकेत बुरख्यावर बंदी आली नसतांनाही बंदी आल्याची अफवा पसरली अन् ही बंदीची भाषा त्या अफवेवर आधारित नुसती बडबड आहे, अशी कोणतीही बंदी येणार नाही, म्हणून सर्वांनी निश्चिंत राहावं. आधीच सैरभैर झालेल्या सत्ताधार्यांना आणखी अडचणीत आणण्याचा हा संजयी कावा आहे, दुसरं काही नाही.